औरंगाबाद : ऊसतोडणी मजुरांचे सहा महिने ऊस तोडणीत जातात. त्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये सर्व कामगारांची नोंदणी ऑनलाईन करता येणार नाही. त्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. त्यांच्या कामाच्या जागेवर नोंदणी करून नंतर साखर कारखान्यांच्या मदतीने ऑनलाईन माहिती भरावी तसेच कारखाना आणि ग्रामसेवकांकडून या माहितीची खात्री करुन घ्यावी, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.श्री.मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील आणि बीड परिसरात ऊसतोडणी कामगारांची अधिक संख्या लक्षात घेता उपकार्यालय बीड येथे असणे आवश्यक आहे. मुख्य कार्यालयासाठी इमारत तयार होईपर्यंत शिवाजी नगर येथील खाजगी जागेत कार्यालय सुरू करावे. महामंडळाचे कामकाज त्वरीत सुरू करून मजुरांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल असे श्री.मुंडे यावेळी म्हणाले.ऊसतोडणीचे काम मजुरांकडून केल्यानंतर साखरेचा उतारा अधिक मिळतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कारखाना आणि मजुरांचे संबंध साखर उत्पादन असेपर्यंत कायम राहणार आहे. या मजुरांची दिनचर्या लक्षात घेता त्यांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना सुविधा देण्यासोबतच महामंडळाने ऊसतोडणी कामगारांचे श्रम कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. साखर आयुक्त आणि महामंडळाच्या समन्वयाने साखर कारखान्यांची कार्यशाळा आयोजित करुन नोंदणी प्रकियेबाबत माहिती संबंधित कामगारांना देण्याचे सांगितले.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊसतोड कामगारांची नोंदणी ॲपद्वारे करताना आवश्यक बदलाबाबत सूचना केल्या. या कामासाठी साखर कारखान्यांचे सहकार्य घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजासाठी 3 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ऊस तोडणी कामगारांचा अपघात विमा, फिरत्या रुग्णालयासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सर्व साखर कारखान्यांना एक समन्वयक अधिकारी नेमण्याची सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ.नारनवरे यांनी यावेळी दिली.या बैठकीनंतर समाज कल्याण आयुक्त यांच्या नवीन इमारतीबाबत आढावा घेण्यात आला. उपलब्ध जागेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करुन आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. शक्य असेल तेथे अस्तित्वात असलेल्या इमारतीवर अतिरिक्त मजल्यांचे बांधकाम करावे, अशा सूचना श्री.मुंडे यांनी यावेळी दिल्या.
दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करावी..!!
RELATED ARTICLES