औरंगाबाद : राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला. मुंबई येथील मालाडमध्ये बांधण्यात आलेल्या मैदानास टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदरपासूनच त्या मैदानाचे टिपू सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्याच्या सहयोगी संघटनांनी जाणून बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजा विरोध लढता-लढता वीर मरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्या बद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला. राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतान यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सर्वांचा देवेंद्र फडणवीस, भाजप व त्याच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे. जाणून बुजून वाद निर्माण करून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे लोक करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विषयी क्रूरकर्मा, हिंदू वर अत्याचार करणारा अशा अपशब्दांचा वापर केलेला आहे. हा भारतीय राज्यघटनेचा, मा. राष्ट्रपती महोदयांचा सुद्धा अपमान आहे. याचा अर्थ असा होतो की भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांना देशाची राज्यघटना मान्य नाही. आम्ही सर्व राज्यघटनेवर, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेवर विश्वास ठेवणारे महाराष्ट्रातील सर्व सुजाण नागरिक असले कृत्य नागरिक कधीच खपवून घेणार नाहीत. आम्ही अशा देश विघातकी कृत्याचा जाहीर निषेध करतो.टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने आपणांस विनंती करण्यात येते की देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि राज्यघटनेच्या अवमान केल्याबद्दल, देशात अशांतता व समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


